मुलांचे करिअर घडविण्यासाठी पालकांना पालकत्व निभावणे फार सोपे असते
शाहीर हरीभाऊ पाटील जयंती दिनी समुपदेशक सतिष पाटील यांचे प्रतिपादन
शाहीर हरीभाऊंची जयंती हा स्मृती जागविण्याचा उपक्रम- बी.एस.दादा पाटील
नंदूरबार - ‘‘मुले खूप चांगली आहेत, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन नाही. विज्ञानाचा उपयोग करून बाळांना समजून घ्या. मुलं परमेश्वराची देण आहे, त्यांना जसं आहे तसं स्विकारा, त्यांच्याविषयी तक्रार करू नका. मुलामुलींवर संपूर्ण विश्वास टाका, जेव्हढा विश्वास टाकाल तेव्हढा विश्वास वाढेल, फक्त निरीक्षण करा, माझे माय बाप चुक पदरात घेऊ शकतात असे मुलांना वाटले पाहिजे, आज मुलांमध्ये संयम नाही तो तयार करा, प्रथम आपणात संयम आणा, जेथे शिकायला मिळेल तेथे मुलांना घेऊन जा घरातील इमोशनल प्रश्न मुलांसमोर आणू नका. घरातले प्रश्न घरात सोडवा, मुलांना वेळ देऊन त्यांचे करिअर घडवा, पालकत्व निभावणे फार सोपे आहे’’ असे प्रतिपादन अमळनेर तालुक्यातील गळवाडे येथील भूमिपूत्र व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले सुप्रसिद्ध समुपदेशक सतिष पाटील यांनी काल स्वातंत्र्यसेनानी शाहीर हरीभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्त शाहीर हरीभाऊ पाटील मंगल कार्यालयात ‘पालकत्व निभावतांना’ या विषयावर मुख्य वक्ते म्हणून बोलतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा पाटील समाज सेवा मंडळाचे सचिव नानासाहेब यशवंत देवराम पाटील हे होते.
समुपदेशक सतिष पाटील पुढे म्हणाले, आपण काय आहोत? हे महत्त्वाचे आहे, आपली जबाबदारी समजली पाहिजे, आपण पालक म्हणून कसे वागतो त्यातुन मुले अनुभव घेतात. आई-वडील हे पहिले शिक्षक असतात, आजच्या पिढीला मी दोष देत नाही. जे दिसतं तसं नसतं. प्रश्न सोडवायचे आहेत. आपण धावपळ कशासाठी करतो? तो प्रश्न स्वत:ला विचारा असे आवाहन करीत ते पुढे म्हणाले, वयाच्या सात वर्षापर्यंतची पिढी ही कोरी पाटी असते, त्याची काळजी घ्यावी हे महत्त्वाचे बीज भविष्य आहे. मुलांबरोबर वेळ घालवणे नोकरीपेक्षा भन्नाट असते ते औषध एनर्जी पॉईंट आहे. कुटुंब खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवात आपणापासून करावी लागेल, वेळ लागतो तो निसर्गनियम आहे. पण फळ निश्चित गोड लागेल. मोठी चुक पोटात घेऊ शकला, ताळमेळ जमला तर ते कुटुंब नक्की पुढे जाते. आधी घरात शिक्षण द्या, भूतकाळ जावू द्या, वर्तमानात या. मुलांना मारू नका, मारल्याने समस्या वाढतात, प्रेमाने जग जिंका, माणूस जिंका, त्यासाठी संयमाची गरज आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या भाषेकडे लक्ष द्या, करिअर कमी खर्चात आहेत. करिअर मुलांना करावयाचे आहे म्हणून त्यांना सांगू नका, सुचवायचे काम करा, आई-वडीलांमध्ये भेद नसावेत त्यामुळे मुले संभ्रमित होतात त्याचा परिणाम मुलांवर होतो. मुलांना तुम्ही जसं समजता तसे ते नाहीत ते पालकांच्या पुढे गेले आहेत. ‘‘आम्हना टाईमले असं व्हतं तसं व्हतं’’ असे मुलांना टोमणे मारू नका त्यांना माहित असतं आई-बापाने काय कष्ट केले म्हणून 20 टक्के पालकांनी पहावे. 80% मुलांवर सोपवा असे मालकांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रणेते, मराठा पाटील समाजसेवा मंडळ नंदूरबारचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस.दादा पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘शाहीर हरीभाऊ पाटील यांची जयंती हा स्मृती जागविण्याचा कार्यक्रम आहजे. त्यांनी समाजप्रती जे काम केले त्यातून प्रबोधन कसे होईल त्या दिशेने प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम असून विद्यार्थी घडविण्यासाठी पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. शाहीर हरीभाऊंनी स्वातंत्र्यपूर्व व तद्नंतर जे काम केले, डाकबंगला जाळणे, आठव्या वर्षी जळून मेलेल्या आईला दवाखान्यात नेण्यासाठी बैलगाडी दिली नाही म्हणून रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देणे, आईच्या मृत्युनंतर दूध पाजणाऱ्या मुस्लीम मातेचे पांग फेडणे, गोरगरीबांसाठी डोळ्यांचे शिबिर भरविणे अशी प्रचंड कामे त्यांच्या खात्यात जमा असून त्यांनी कधीही या कामांना ‘कॅश’ केले नाही अथवा स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुविधांचा लाभ घेतला नाही. शिक्षक असलेले हरीभाऊ स्वत:ला हरीजन पाटील म्हणत. हरीभाऊ व उषाताई पाटील या दांपत्याने जे समाजसेवेचे काम केले, त्यांचे ऋण फेडण्यासाठी नैतिक जबाबदारी व कर्तव्य भावना म्हणून आम्ही आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य बी.एस. दादा पाटील यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे सचिव डॉ. दिपक अंधारे, प्रा. डॉ. एन.डी. नांद्रे, यांनी शाहीर हरीभाऊ पाटील यांच्या प्रती ऋण व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब यशवंत देवराम पाटील यांनी समारोप करतांना सांगितले, ‘‘भगिनींनी 21वे शतक गाजविले पाहिजे, संधीचे सोने करा, महिला सशक्तीकरणाच्या नावाने शाळा मिळविणाऱ्या पुरुषांविरुद्ध आवाज उठवा.
या कार्यक्रमास व्यासपीठावर समाज मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील, उपाध्यक्ष शालीग्राम पाटील उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. डी.एस. सोनवणे, व्ही. एम. देवरे, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एन.डी. नांद्रे, समाज मंडळाचे सहसचिव कवी निंबाजीराव बागुल, राजेंद्र पाटील, राजेंद्र बागुल, रोहीदास जाधव, प्रा. डॉ. व्ही. एम. अहिररराव व प्रा. श्रीराम दाऊतखाने, आदींनी परिश्रम घेतले. शेवटी प्रा. श्रीराम दाऊतखाने यांनी म्हटलेल्या पसायदानाने आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास शहरातील पालक व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरीकांसह बहुसंख्येने नंदूरबारकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालकांच्या शंकांचे सतिष पाटील यांनी निरसन केले. शाहीर हरीभाऊ पाटील बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व मराठा पाटील समाज सेवा मंडळ नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या व्याख्यानाचे उपस्थितांनी कौतुक केले.
Post a Comment
0 Comments