अ.ध. वसावे साहेबांसारखी माणसे दगड झाली
म्हणूनच उमवि सारखे नंदनवन फुलवू शकलो
प्रथम कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन
नंदूरबार- उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना झाली त्यावेळची परिस्थिती केविलवाणी होती; शासनाने केवळ बारा लाखाची मदत केली. तत्कालीन सरकार बरे होते, आमच्या कामकाजात त्यांनी हस्तक्षेप केला नाही. सरकारने मला विद्यापीठ कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार दिले म्हणून मी अ.ध. वसावे साहेब यांचे नाव सुचवू शकलो. कार्यकारिणीत वसावे साहेबांसारखी सुंदर माणसे स्वत: काम करतांना दगड झाली म्हणूनच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रुपाने नंदनवन फुलवू शकलो. असे प्रतिपादन कबचौ विद्यापिठाचे संस्थापक कुलगुरु तात्यासाहेब डॉ. एन. के. ठाकरे यांनी काल मातृपितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी स्वयंसेवी संस्था कावठेच्या वतीने आदिवासी समाजातील प्रथम सेवानिवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे साहेब यांच्या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा समारंभ प्रसंगी बोलतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस.दादा पाटील होते.
अ.ध. वसावे साहेब हे निगर्वी असून त्यांनी कार्यकारिणीत काम करतांना कधीही सोयी सुविधांचा आग्रह धरला नाही. आदिवासीपण जपले, आदिवासीपण जपण्याची आवश्यकता असून त्यासाठी नंदूरबार येथे स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ व्हावे अशी आग्रही मागणी डॉ. ठाकरे यांनी केली. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. विश्वास पाटील आपल्या भाषणात म्हणाले, अ. ध. वसावे साहेब हे अक्षराचे उपासक आहेत. त्यांचे जीवन समर्पित आहे. त्यांच्या जीवनातून समर्पणाचा धडा घेतला तर नक्कीच आजचा सत्कार सार्थकी लागेल. प्राचार्य एम.एल. नानकर भाषणात सांगितले की सत्यतेचा धडा आम्ही वसावे साहेब यांच्याकडून शिकलो. त्यांची शिकवण भविष्यात आम्हाला कामी आली. उपकुलगुरु एस.टी. इंगळे म्हणाले, तत्कालीन कार्यकारिणीत अ.ध. वसावे साहेबांसारखी माणसांनी जो विद्यापीठाचा पाया रचला कणखर केला त्यामुळेच आम्ही आज सुलभ काम करू शकलो, मानांकन मिळवू शकलो. माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘अ.ध. वसावे साहेबांचे वागणे सर्त्पुष्य माणसासारखे आहे. निवृत्तीनंतर विद्यापीठात त्यांनी पायाभरणीचे जे काम केले ते अतुलनियच होते. त्यांची भावना प्रामाणिक असते. निवृत्तीनंतर पंचतारांकित जीवन जगणे शक्य होते; परंतु ते ठोकरून समाजात मिसळले. त्यांच्या कामाचे नक्कीच मूल्यमापन होईल. समाज, गाव, तालुका, जिल्हा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विसरणार नाही.
अ.ध. वसावे साहेब सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, ‘‘मी 70 वर्ष सार्वजनिक जीवनात फिरतो आहे. मुलांना नुसते शिक्षण न देता जगण्याची कला शिकविली पाहिजे. शिक्षक जोपर्यंत मुलांना स्वत:ची मुले मानून शिकवत नाहीत तोपर्यंत शिक्षणाला अर्थ नाही. मी जे काम केले तो माझ्या आनंदाचा भाग होता. ते श्रेय माझे नाही. पुस्तकेही नुसती वाचायची नसतात, जे वाचले ते डोक्यात घुसले पाहिजे, मला अजुनही अभ्यासाची हौस आहे. ध्यानीमनी नसतांना मी आय.ए.एस. झालो. आपल्या बुद्धीवर व मेहनतीत विश्वास ठेवा असे उपस्थितांना आवाहन करीत बी.एस. दादांनी दिलेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस.दादा पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, अ.ध. वसावे साहेबांना दिलेल्या पुरस्कारामुळे आमच्या पुरस्काराला प्रतिष्ठा मिळाली. आम्ही आज योग्य माणसाला योग्य व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार देत आहोत. अ. ध. वसावे साहेबांनी 1975च्या आणीबाणीत सावकारांकडून गोरगरीबांच्या जमिनी मिळवून दिल्या, आदिवासींना कर्जमुक्त केले. त्यांना जाण व व्हीजन होते म्हणून ते उत्कृष्ठ काम करू शकले. त्यांच्यामुळेच उभे राहिलेल्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रातून हजारो विद्यार्थी अधिकारी झाले, येथील ग्रंथचळवळ आम्ही अ.ध. वसावे साहेबांना समर्पण करीत आहोत. निर्मितीचा आनंद महत्त्वाचा असतो. म्हणूनच आम्ही एकलव्य विद्यालयात कार्यक्रमांऐवजी अ.ध. वसावे साहेबांमुळे उभ्या राहिलेल्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रमाला प्राधान्य दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्ही.एस. देवरे यांनी केले. प्रा. एन. डी. नांद्रे यांनी प्रास्ताविक केले, प्रा. डॉ. डी. एस. सोनवणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. एस.एन. पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले, प्रा. व्ही. एस. देवरे यांनी आभार मानले. प्रा. श्रीराम दाऊदखाने यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. रत्नमाला बाबुराव पाटील, नंदुरबार तालुका विधायक समितीचे मानद सचिव नानासाहेब यशवंत देवराम पाटील, प्रमोद वसावे साहेब, डॉ. सुहासभाऊ नटावदकर, प्राचार्या सौ. सुहासिनीताई नटावदकर, सुहास वसावे, जयकुमार वसावे, निंबाजीराव बागुल, प्रा. विजय भोसले, एस.एन. पाटील, व्ही.एम. अहिरराव, प्राचार्य डी.एस. पाटील, प्राचार्य डॉ. सुनिल कुवर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments