छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान;
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी बैठक संपन्न
नंदुरबार, दिनांक 16 एप्रिल, 2025 (जिमाका) :
शासनाच्या 25 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सावन कुमार तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शासन निर्णयानुसार क्षेत्रीय स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी आणि महिला यांचे दैनंदिन प्रश्न सोडवणे आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे हा आहे. तसेच प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा देखील या अभियानाचा उद्देश आहे.
या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 17 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी संयुक्तपणे शिबिरांचे आयोजन करतील. या शिबिरांमध्ये महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडील विविध दाखले याबाबत लाभ देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांना या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments