गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे विशेष पोर्टल;
लोकशाही दिनाच्या धर्तीवर तात्काळ अडचणी सोडवणार
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
८८ उद्योगांसोबत रु. २५९१ कोटींच्या गुंतवणूक व ३३२५ रोजगार निर्मितीचे सामंजस्य करार
नंदुरबार ।दिनांक ९ एप्रिल २०२५ (जिमाका) जिल्ह्यातील टेक्सटाईल उद्योग, कृषी प्रक्रिया आधारित उद्योग आणि इतर स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करून अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पोर्टल तयार करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पोर्टलद्वारे उद्योजक आपले प्रश्न व अडचणी थेट नोंदवू शकतील, आणि त्या प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर तात्काळ सोडवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.
आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुंतवणूक परिषद-२०२५ संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिषदेत उद्योग सहसंचालक (नाशिक विभाग) श्रीमती वृषाली सोने, मैत्री कक्षाचे प्रतिनिधी किशोर चव्हाण, नाशिक विभागाचे सिडबी प्रतिनिधी शंतनू श्रीवास्तव,, मुंबई मैत्री कक्षाचे स्वप्नील केंद्रे, निर्यात समन्वयक सूरज जाधव, तसेच अपेडा, मुंबई येथून ऑनलाईन मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती प्रणिता चौरे यांनी सहभाग घेतला. या परिषदेला जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, व्यापारी, तसेच इतर संबंधित कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी, तसेच महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार हे उपस्थित होते
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या उपक्रमांची सविस्तर माहिती देताना सांगितले की, जिल्हा निर्मितीनंतर आतापर्यंत ५०० नवीन उद्योग घटकांची स्थापना झाली आहे. हे यश अधिक व्यापक करण्यासाठी जिल्हा प्रशासन मार्केटिंगच्या सुविधा, विक्री यंत्रणा आणि ग्रामीण भागातील लघु उद्योजकांसाठी टेस्टिंग लॅब उभारणार आहे. या माध्यमातून बचतगट व स्थानिक उत्पादक यांना त्यांच्या उत्पादनांचे गुणवत्तेचे मूल्यांकन करता येईल आणि बाजारपेठ मिळवण्यास मदत होईल. जिल्हा प्रशासन आणि उद्योग केंद्र यांच्या समन्वयाने उद्योजकांच्या अडचणी तत्काळ सोडवण्याचे काम केले जाणार असून, नंदुरबार जिल्हा नवउद्योजकांसाठी सक्षम व सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करीत आहे.
नवीन उदयोग घटकांना भालेर औद्योगिक वसाहती मध्ये सर्व सोई-सुविधा तसेच शहादा येथे नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळसाठी भुखंड अधिग्रहीत करण्याचे काम सुरु असून त्यासाठी पाठपुरावा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. पुढील १ ते २ वर्षात तेथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापित होईल. ज्यात अधिकाधिक उदयोग घटक स्थापित होतील अशी अपेक्षा व्यक्त करुन उपस्थितांना गुतंवणुकीसाठी आवाहन करताना डॉ. सेठी यांनी नंदूरबार जिल्ह्याची अतिदूर्गम व आकांक्षित जिल्हा ही ओळख पूसून अतिविकसीत नंदूरबार अशी ओळख करण्याच्या मानस व्यक्त केला.
उद्योग सहसंचालक श्रीमती वृषाली सोने यांनी परिषदेत बोलताना सांगितले की, राज्याच्या उद्योग धोरणानुसार २०३० पर्यंत गुंतवणूक उद्दिष्टे गुंतवणूक परिषदांच्या माध्यमातून साध्य करण्याचा मानस आहे. नंदुरबार जिल्ह्यात वस्त्रोद्योग ,तसेच मिरची पावडर उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ या क्षेत्रातील उद्योजकांना कसा घेता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.परिषदेदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार व गुंतवणूक संकल्पना साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासोबतच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य झाल्याबद्दल श्रीमती सोने यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचे यावेळी आभार मानले.
८८ उद्योग, रु. २५९१ कोटींची गुंतवणुक व ३३२५ रोजगार निर्मितीचे सामंजस्य करार
जिल्हा गुंतवणूक परिषदेत आज ८८ उद्योग घटकांसोबत एकूण रु. २५९१ कोटींचे गुंतवणुकीचे आणि ३३२५ रोजगार निर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू होतील, रोजगाराच्या संधी वाढतील, निर्यातीत वाढ होईल आणि गावांतील लोकांचे शहरांकडे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल.
या परिषदेमध्ये टेक्सटाईल, मिरची प्रक्रिया, कृषी प्रक्रिया व अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास वेगाने होईल.
Post a Comment
0 Comments