Type Here to Get Search Results !

आपले वसतिगृह सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनवा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

 आपले वसतिगृह सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनवा

– जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) – ज्या वसतिगृहात आपण शिकत आहात त्या वसतिगृहाची ओळख ही आपल्या राबवलेल्या उपक्रमातून सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनले पाहिजे. न्याय हक्क यासाठी आंदोलन राबवले पाहिजेच, परंतु मिळत असलेल्या गोष्टीतून आपली सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नती केली पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जिल्हाधिकारी आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांसह हितगुज करताना विचार मांडले.

यावेळी ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रा. संदीप केदार अनुवादित इंदाई प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 500 पुस्तकांचे जैन इरिगेशन यांच्या सौजन्याने मोफत वितरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये श्री अरुण पवार, प्रकल्प अधिकारी यांनी वसतिगृहास देण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांची माहिती दिली. सदर सोयीसुविधा उपलब्धतेकरिता आदरणीय मंत्री श्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांचा उत्तम सहयोग लाभल्याचे यावेळी नमूद केले.


यावेळी मंचावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जैन इरिगेशनचे मिडिया विभागाचे अनिल जोशी, जिल्हा कृषि अधीक्षक कुर्बान तडवी, श्री प्रशांत माहुरे व श्री जावेद तडवी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रा. संदीप केदार, द इंडियन एक्स्प्रेसचे अनिल सोनवणे आणि बांभोरी गावाचे सरपंच बिऱ्हाडे तसेच गृहप्रमुख श्री संतोष बच्चे व श्री विजय गाडे, वासुदेव बच्चे, अलंका दाभाडे, मीनाकुमारी चौधरी हे उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे पारंपरिक पद्धतीने विद्यार्थी विद्यार्थिनींनी आदिवासी पेहराव आणि पारंपरिक नृत्य करत स्वागत केले. यावेळी पुस्तकाचे अनुवादक प्रा. संदीप केदार आणि जैन इरिगेशनचे मिडिया विभागाचे अनिल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इंदाई प्रकाशनचे देवेंद्र करकरे, वसंत राठोड, संतोष खोपडे, किशोर सोनवणे हेही उपस्थित होते.


तसेच पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध प्रकारचे उपक्रम, ज्यात तुमची पकड आहे – जसे मैदानी खेळ, अभ्यास, नृत्य, व्यक्तिमत्व विकास, वकृत्व कौशल्य आदी गोष्टीत सहभाग घ्यावा असे आवाहन केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित 500 पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींसोबत दिलखुलास चर्चा केली.

Post a Comment

0 Comments