तळोदा येथे ऊस शेतात विजेचा तारांवर शॉर्ट सर्किटने ऊस व जळून खाक
तळोदा येथील गिरधर काशीनाथ पिंपरे यांच्या मालकीच्या दोन एकर क्षेत्रावर लावलेला ऊस शेतात विजेचा तारांवर शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक झाला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यात आला आहे.
विज वितरण कंपनीच्या लापरवाहीमुळे श्री. पिंपरे यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्याकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
तळोदा भंवर शिवारातील गिरधर काशीनाथ पिंपरे (वय ६५) यांच्या मालकीचे दोन एकर (सर्वे नंबर १३/१ अ) शेत असून त्यांनी उसाची लागवड केली होती. वर्षभर शेतात राबून त्यांनी उसाची व्यवस्थित निगा घेतली. दरम्यान आता लवकरच कारखाने सुरू झाल्यावर उसाची तोड करण्यात येणार होती. पण दोन दिवसांपूर्वी शेतामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे संपूर्ण दोन एकर ऊस हा जळून खाक झाला. त्यात अंदाजे १३० ते १४० टन ऊस जळाला आहे. यात त्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी विज वितरण कंपनी कडे केली आहे.
दरम्यान या परिसरातील शेतशिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते आणि अशाप्रकारे शॉर्ट सर्किट होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात अग्नी उपद्रवाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकरी गेले असता, गुन्हा दाखल करुन काय मिळते? असा प्रश्न उपस्थित करुन शेतकऱ्याला पोलिसांनी गुन्हा दाखल न करता हुसकावून लावले.


Post a Comment
0 Comments