तळोदा शॉर्ट सर्किटमुळे शेतात लागलेल्या आगीत ऊस जळून खाक संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्याकडून नुकसान भरपाईची मागणी
तळोदा, ता. २९ येथील विजयकुमार कांतीलाल शेंडे यांच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रावर लावलेला ऊस शेतात शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक झाला आहे. त्यामुळे श्री. शेंडे यांचे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्याकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर विजयकुमार कांतीलाल शेंडे (वय ४६) यांच्या मालकीचे तीन एकर (सर्वे नंबर २८१/०२) शेत असून त्यांनी उसाची लागवड केली होती. वर्षभर शेतात राबून त्यांनी उसाची व्यवस्थित निगा घेतली. दरम्यान आता लवकरच कारखाने सुरू झाल्यावर उसाची तोड करण्यात येणार होती. पण काही दिवसांपूर्वी शेतामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे संपूर्ण तीन एकर ऊस हा जळून खाक झाला.
त्यात अंदाजे १३० ते १४० टन ऊस जळाला आहे. यात त्यांचे सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
दरम्यान या परिसरातील शेतशिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते आणि अशाप्रकारे शॉर्ट सर्किट होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात अग्नी उपद्रवाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गौतम बोराळे करीत आहेत.




Post a Comment
0 Comments