शबरी माताची प्रभू श्रीरामचंद्रांवर असलेली श्रद्धा भक्ती आजही कायम - भागवताचार्य अविनाश जोशी
नंदुरबार शहरातील श्री मोठा मारुती श्रीराम मंदिर संस्थांनच्या सभागृहात सोमवारपासून श्रावण मासनिमित्त श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ झाला आहे.मराठी, हिंदी, गुजराती, अहिराणी या भाषांवर प्रभुत्व असलेले भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण करीत आहेत. याप्रसंगी पुढे बोलताना अविनाश जोशी म्हणाले की, श्रावण मास श्रवणीय मास आहे. यात जास्तीत जास्त श्रवण केले पाहिजे. जिथे देव चर्चा सुरू आहे तेथे आपण श्रवण केले पाहिजे. भगवंतांच्या नामस्मरणाने पुण्यप्राप्ती होऊन स्वर्गलोक मिळत असतो. प्रत्येकाच्या नशिबी भागवत सप्ताहाचे आयोजन तसेच श्रवणाचा लाभ होत नसतो. येथील कथेसाठी यजमानांची स्वयंस्फूर्ती भक्ती महत्त्वाची आहे. असेही जोशी म्हणाले. श्रीमद् भागवत कथेप्रसंगी संगीतमय भजन व संगीत सुरू असल्याने सभागृहात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार दि. 11 ते 18 ऑगस्ट दरम्यान दररोज दुपारी दोन ते पाच कथा सुरू आहे. हिंदू सेवा सहाय्य समिती, श्री मोठा मारुती श्रीराम मंदिर संस्थान आणि भक्त गणांच्या सहकार्याने श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी सकाळी सोनी विहीर पासून श्रीमद् भागवत ग्रंथाची शोभा यात्रा काढण्यात आली. भाविकांच्या उपस्थितीत शोभायात्रा मोठा मारुती मंदिर सभागृहात पोहोचली. दि. 18 ऑगस्ट रोजी कथेची सांगता होणार असून महाप्रसाद भंडारा वितरण होईल. भाविक भक्तांनी पवित्र श्रावण मासात श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मोठा मारुती मंदिर सेवा समिती, कथेचे यजमान परिवार आणि सेवेकरी यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments