Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी आधार व कागदपत्र पडताळणी अनिवार्य; 30 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत -विजय रिसे

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी आधार व कागदपत्र पडताळणी अनिवार्य; 30 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत -विजय रिसे


#नंदुरबार, दिनांक 03 एप्रिल, 2025 (जिमाका) :

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी यापूर्वी सहा महिने होता, परंतु आता तो वाढवून अकरा महिने करण्यात आला आहे, याशिवाय, सध्या प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेत नव्याने सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांनी आपली आधार आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 


ज्या उमेदवारांनी 10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना उर्वरित पाच महिन्यांचे कार्यप्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याशिवाय, सध्या प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेत नव्याने सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांनी आपली आधार पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.


या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी (Direct Benefit Transfer) थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे विद्यावेतन दिले जाते. त्यामुळे उमेदवारांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.


उमेदवारांनी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन इंटर्न लॉगिन (Intern Login) मधून साईनअप (Sign Up) करून आपला आधार क्रमांक प्रविष्ट करून, ओटीपी (One Time Password एक वेळचा पासवर्ड) टाकून पडताळणी करावी. ओटीपी यशस्वीरीत्या पडताळल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून प्रवेश मिळतो.


प्रशिक्षणार्थी व आस्थापना या दोघांनीही याच पोर्टलवरील प्रतिज्ञापत्र नमुना डाऊनलोड करून पूर्ण भरून स्वाक्षरीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार येथे सादर करणे अनिवार्य आहे. आधार पडताळणी न करता कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यास पुढील प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येणार नाही, हे शासनाने स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. याचप्रमाणे, ज्या आस्थापना या योजनेतर्गत प्रशिक्षणार्थी घ्यायच्या इच्छुक आहेत, त्यांनी देखील शासन नियमांनुसार आपली पात्रता व क्षमतेचे आवश्यक कागदपत्र तपासणीसाठी सादर करून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी रुजू करून घ्यावे.


ही संपूर्ण प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या आधी पडताळणी न झाल्यास उमेदवारांना प्रशिक्षणात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार व आस्थापनांनी दिलेल्या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी.


यासंदर्भात अधिक माहितीसाठी 8055118551/ 9601111337 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा जिल्हा समन्वयक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार येथे प्रत्यक्ष भेट घ्यावी, असेही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 


Post a Comment

0 Comments